info@mycompany.io1-800-123-4567

    धूरविरहित शहरांचे स्वप्न!

    • Home
    • Marathi Blogs
    • धूरविरहित शहरांचे स्वप्न!

    लीड – 

    मोठमोठे धुळीचे वादळ, धूलिकणांचे ढग आणि अंतराळातून पृथ्वीवर झालेल्या उल्कापातामुळे साठ दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवरील सजीव प्रजाती पाच वेळा नामशेष झाल्या होत्या. आता माणसाच्या लोभी वृत्तीमुळे आणि त्यांच्या चुकांमुळे सजीव प्रजाती सहाव्यांदा लुप्त होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. 

    माणूस, प्राणी, पक्षी, वनस्पती, किटक आदी सजीव घटकांना हानिकारक असणारे घटक जेव्हा वातावरणात मिसळतात, तेव्हा हवेचे प्रदूषण झाले असे मानतो. सध्या हवामान बदलास जबाबदार घटक हवेच्या प्रदूषणाला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. राजधानी दिल्लीसह देशात सर्वच ठिकाणी वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी अतिसूक्ष्म धूलिकणांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येते. दहा मायक्रोमीटरपेक्षा लहान कणांत २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान कणांचे प्रमाण सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हे प्रमाण दोन-तीन दशकांपूर्वी ५ टक्क्यांपेक्षाही कमी होते. भारतातील सर्व मोठी शहरे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. 

    माणसाची गरज की लोभ

    १९७२ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत गरिबी आणि प्रदूषण या गोष्टी एकमेकांना जोडल्या होत्या. ‘गरिबी नव्हे, सर्वात मोठ्या प्रदूषणकर्त्याची गरज आहे?’ असे त्या म्हणाल्या होत्या. अनेक जणांनी असा विचार केला की, कदाचित इंदिरा गांधी यांना गरज (नीड) नव्हे, तर लालसा (ग्रीड) असे म्हणायचे असेल. परंतु त्यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांचा पुनरुच्चार केला होता. महात्मा गांधींच्या मते, पृथ्वी माणसाला सर्व काही गोष्टी पुरवते, परंतु प्रत्येक माणसाचा लोभ पुरवू शकत नाही.

    कोण भरडले जातात?

    हवा प्रदूषण ही समस्या वैज्ञानिकदृष्ट्या जागतिक पातळीवर स्वीकारली गेली आहे. शहरीकरणामुळे वायूप्रदूषणाच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. प्रदूषणामध्ये विशिष्ट पदार्थांचा समावेश असतो. त्यामध्ये आगीतून बाहेर पडणारे बारीक कण, २.५ मायक्रॉन्स आकाराचे जैविक घटक आणि धातूचे सूक्ष्मकण असतात. हे कण अतिसूक्ष्म असतात. धूळीचे कण जवळपास १०० मायक्रॉन्स आणि मानवी केसाचा व्यास जवळपास ५० मायक्रॉन्स असतो. या आकाराचे कण फुफ्फुसाद्वारे रक्तात सहज प्रवेश करून शरीरातील सर्व भागात पोहोचतात. यामुळे कर्करोग, हृदयविकार आणि श्वसनाच्या आजाराचा धोका वाढतो. दी नेचर या नियतकालिक आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार (WHO) घराबाहेरील आणि घरातील वायूप्रदूषणामुळे दरवर्षी जवळपास सात लाख लोकांचा मृत्यू होतो. मलेरिया, एचआयव्ही/एड्स आणि एकत्रित आत्महत्या या घटनांमध्ये होणार्या मृत्यूपेक्षांही अधिक प्रदूषणामुळे मृत्यू होतात. यातील बहुसंख्य मृत्यू भारत आणि चीनमध्ये होत आहेत. सामान्य लोकांच्या इतर कोणत्याही गोष्टींप्रमाणेच यामध्ये गरिब लोकांना सर्वाधिक भरडले जातात. प्रदूषणापासून सुरक्षित राहण्यासाठी त्यांच्याकडे महागडे, रंगीत मास्क नसतात. त्याने वास्तविक समस्या सुटू शकत नाहीत. हवाप्रदूषणाशी सामना करताना समाजातील गरिब लोकांची क्षमता नसल्याने त्यांना सर्वाधिक सहन करावे लागते.

    शहरीकरणाची समस्या

    नवी दिल्लीचीच परिस्थिती पाहायची झाल्यास तेथील वायूप्रदूषणाचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. दिल्लीची सध्याची लोकसंख्या सध्या २५ दशलक्ष आहे. दहा वर्षांमध्ये ती दुप्पट होण्याची शक्यता आहे. हवा प्रदूषण आणि पर्यावरणाची घसरण होण्याचे प्राथमिक परिणाम म्हणजे, वेगाने होणारे आणि न थांबविता येणारे शहरीकरण होय. जगातील निम्म्यापेक्षा अधिक लोक शहरात राहतात. याला भारतसुद्धा अपवाद नाही. शहरीकरणाकडे होणारी जगाची वाटचाल अपरिहार्य आहे. ती गरज (नीड) आणि लालसा (ग्रीड) या दोन्ही गोष्टीतून उत्पन्न झालेली आहे. शहरात स्थलांतरित झालेले लोक पुन्हा माघारी जाऊ शकले नाहीत. त्यामुळेच माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी सांगितलेल्या सूत्रानुसार पुरा (PURA – PROVIDING URBAN AMENITIES IN RURAL AREAS) म्हणजेच ग्रामीण भागात शहरांप्रमाणे सुविधा पुरविणे आवश्यक आहे. तरच स्थलांतर थांबविले जाऊ शकते. सध्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरीकरणाकडे गरिबी निर्मुलनासाठी एक संधी म्हणून पाहात आहेत. शहरीकरण हे विकासाच्यादृष्टीने अत्यावश्यक बाब झाली आहे. 

    शहरांतील दारिद्रय

    दिल्लीतील दहा टक्के लोक दारिद्रय रेषेखाली राहतात. एका अंदाजानुसार जवळपास निम्म्याहून अधिक स्थलांतरित लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. ते स्वयंपाक आणि इतर गोष्टींसाठी सरण म्हणून लाकूड, जळण, लाकडाचा भुसा आदींचा वापर करतात. अर्धवट जळणामुळे मोठ्या प्रमाणात धूर होतो. धुरामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी अशा लोकांना धूर न होऊ देणार्या चूल, स्टोव्ह आणि बायोगॅस पुरवणे आवश्यक आहे. परंतु ही साधने खूपच वेळखाऊ आणि खर्चिक आहेत. आंतरिक बदल केलेल्या चूल वापरण्याऐवजी गरिबांचे स्वप्न असलेले गॅस कनेक्शन पुरविणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत गरिबांना चूल पेटवू नका असे आपण म्हणू शकत नाही. कारण स्वयंपाक हा जीवन जगण्याचा एक भाग असतो. अशा प्रकारचे प्रदूषण गरज (नीड) या व्याख्येत बसते. अगदी दूरवरचा विचार केल्यास अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी जळणामधील भुसा किंवा अर्धवट जळालेल्या लाकडाचाही वापर केला जाऊ शकतो. 

    शेतांमधील धूर

    शेतीपिकांच्या काढणीनंतर उर्वरित तण हटविण्यासाठी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये आग लावली जाते. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब या भागात हा प्रकार सर्रास पाहिला जतो. येथील शेतकर्यांची ही परंपराच आहे. आगामी हंगामातील पीक चांगले व दर्जेदार यावे यासाठी ते तण जाळतात. एका संशोधनानुसार, शेतातील तण जाळण्याने जमिनीची सुपिकता वाढत नाही. उलटपक्षी हवेचे प्रदूषण वाढण्यासच जास्त मदत होते. जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी शेतकर्यांमध्ये जागृती करण्यासह नव्या पद्धतींचा शोध लावणे गरजेचे आहे. 

    वाहतुकीमुळे प्रदूषणात भर

    दिल्लीमध्ये गरीब आणि श्रीमंत लोक मिळून जवळपास १२ लाख खासगी आणि व्यावसायिक वाहने चालवितात. वाहतूक कोंडी किंवा सिग्नलवर वाहने थांबल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर होतो. इंधन कार्यक्षमतेचे निकष ठरविण्यासाह जुन्या वाहनांवर बंदी आणण्याच्या उपाययोजना जगभरात केल्या जात आहेत. या धोरणांची अंमलबजावणी करण्यास अडथळा आणण्यासाठी भ्रष्टाचारी वाहनमालक आणि वाहननिर्माते राजकीय नेत्यांनाही फसवतात. अशा काही हानिकारक गैरपद्धती समाजामधील लालसा (ग्रीड) वाढवतात. भ्रष्टाचार प्रदूषणाला खतपाणी घालत असतो. 

    बांधकामांना धोक्याचा इशारा

    देशात चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी बांधकाम महत्त्वाचे आहे. रस्ते, रुग्णालये, घरे आणि शाळांच्या माध्यमातून देशातील गृहनिर्माण क्षेत्रातील वाढ झाली आहे. गेल्या दशकात यातील उत्पन्न चांगलेच वाढले आहे. २०२० पर्यंच दिल्लीच्या आसपास जवळपास २० दशलक्षांहून अधिक घरे बांधण्यात आल्याचा एक अंदाज आहे. हवाप्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली तर बांधकाम प्रकल्पांवर बंदी आणली जाऊ शकते. 

    कोळशामुळे आगीत तेल 

     प्रत्येक घरात वीज पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात वापरल्या जाणार्या कोळशामुळेही वायूप्रदूषणात लक्षणीय वाढ होत आहे. वीजनिर्मिती बंद पडली तर अत्यावश्यक सेवा विस्कळित होतील. वीजेची पर्यायी व्यवस्था उभी करण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे वीजनिर्मितीची क्षमता वाढविणे तसेच स्वच्छ कोळसा तंत्रज्ञान कमी कालावधीत हवा प्रदूषण घटविण्यास मदत करू शकेल. कोळशाचा वापर हळूहळू कमी करण्यासाठी भारताला पारदर्शक आणि मुदतीचे नियोजन करणे गरजेचे आहे. सौरऊर्जा, पवनचक्की, लहान हायड्रो प्रकल्प असे पर्यायी विकासाचे मॉडेल तयार करावे लागणार आहेत.

    दीर्घकालीन उपाय आवश्यक

    वातावरणातील चढ-उतार, ऊन-पावसातील बदल हे कोणाच्याच हातात नाहीत. पण पर्यावरणावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी आपल्याला दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. विकसनशील देशांमध्ये वाहनांसाठी सम-विषम हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. आरोग्यदायी आणि शाश्वत विकासासाठी तसेच ‘सबका साथ सबका विकासा’साठी आपल्याला आपत्ती व्यवस्थापन आणि दीर्घकालीन उपाय याचे संतुलन राखावे लागेल. तेव्हाच हवेच्या प्रदूषणावर मात करणे शक्य होईल. 


    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *