info@mycompany.io1-800-123-4567

    पर्यावरणाची आणीबाणी

    लीड –

    पर्यावर म्हणजे नेमके काय रे भाऊ? असे कोणी विचारले तर, लोकांकडून अनेक मजेशीर उत्तरे मिळतात. गमतीचा भाग सोडला तर अनेकांना पर्यावरण म्हणजे नेमके काय असते हेसुद्धा कळत नाही. झाडे लावा झाडे जगवा‘, सामाजिक वनीकरण, हे शब्द आपल्याला जागतिक पर्यावरण दिनीच पाहायला, ऐकायला किंवा वाचायला मिळतात. असे का घडत असेल? कारण आपण फक्त बोलतो, कृती करत नाही. म्हणजे आपण वर्षातील ३६५ दिवसांपैकी एकच दिवस पर्यावरण दिन साजरा करतो. बाकीचे ३६४ दिवस पहिले पाढे पच्चावन्न. म्हणूनच पर्यावरण आणि आणीबाणी हे समानार्थी शब्द आहेत का, असे विचारण्याची वेळ आली आहे. 

    संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमांतर्गत जागतिक पर्यावरण दिन ५ जूनला साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढविण्यासह जागरूकता निर्माण करणे तसेच पर्यावरणाविषयी निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी पोषक वातावरणनिर्मिती करणे हा त्यामगचा उद्देश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या १९७२ साली झालेल्या महासभेत पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविण्यात आले. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी कृतिशील सहभाग घेण्याचे ठरविण्यात आले. त्यादृष्टीने शास्वत विकासाचे ध्येय साधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

    याचदरम्यान वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वातावरणावर विपरित परिणाम झाले. मानवनिर्मित फ्लोरोफ्युओरोकार्बन रसायनाचे उत्सर्जन वाढल्याने ओझोन वायूचा थर घटत असल्याचे लक्षात आले होते. ओझोनचा थर लक्षणीयरित्या घटल्याचे निदर्शनास आल्यानंतर जगभरातील १४६ विकसित देशांची क्षमता वाढविण्यासोबत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी माझ्या नेतृत्वाखाली अनेक यशस्वी उपक्रम राबविण्यात आले. परिणामस्वरूप ओझोनचा थर पुनर्स्थितीत येण्याच्या मार्गावर आहे. परंतु माणसांच्या चुकांमधून निर्माण झालेल्या पर्यावरणबाबतच्या समस्या सुटणार का प्रश्न अनुत्तरितच आहे. 

    २०२० सालचा जागतिक पर्यावरण दिन कोविडच्या आणीबाणीसदृश परिस्थितीत साजरा झाला. मानवाधिकारांचे उल्लंघन, वर्णभेद, युद्धामुळे निर्वासित झालेले लोक, टोळांचा शेतांवर हल्ला, चक्रीवादळे आणि राजकीय उलथापालथ अशा सगळ्याच क्षेत्रात आणीबाणीचे वातावरण होते. अशा वातावरणात संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमांतर्गत (युनेप) “जैवविविधता साजरा करा” हा विषय घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. माझ्या मते युनेपने घेतलेला हा  खूपच धाडसी निर्णय होता. 

     जैवविविधता आणि पर्यावरणासाठी काम करणार्या आंतरसरकारी विज्ञान व्यासपीठाच्या (आयपीबीईएस) २०१९ सालच्या अहवालात म्हटले आहे की, जवळपास एक अब्ज जैव प्रजाती जगातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आज या प्रजाती नामशेष होण्याचा दर गेल्या दहा दशलक्ष वर्षांच्या सरासरी शेकडो पट अधिक आहे. तेव्हा पुन्हा प्रश्न निर्माण होतो की, आपण नेमके काय साजरे करत आहोत? कोविड-१९ मुळे संपूर्ण जग स्तब्ध झालेले असताना माणसाने कदाचित प्रथमच ही जैवविविधता त्यांच्या मूळ ठिकाणी इतक्या जवळून पाहिली असेल. गेल्या काही शतकांपासून माणसाने या जैवविविधतेवर अतिक्रमण केले आहे. हेच आपल्याला साजरे करायचे आहे का? बीजिंग विद्यापीठ आणि आयआयटी गांधीनगरने नुकताच त्यांच्या कँपसमध्ये जैवविविधतेवर अभ्यास केला आहे.

    जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी पुणे येथील तेर पॉलिसी सेंटरच्या स्मार्ट कँपस क्लाउड नेटवर्कने विकसित केलेला आराखडा घेऊन इतर विद्यापीठे आणि महाविद्यालये घेऊन पुढे येत आहेत. (sccnhub.com)  देशातील जमिनीचे निकृष्टतेचे उच्च प्रमाण शोधून काढून जैवविविधता आणि जंगलामधील एक उपयुक्त असा दुवा शोधणे गरजेचे आहे. २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या “वाळवंटीकरणाचा सामना कसा करावा”, या विषयावरील अधिवेशनात (यूएनसीसीडी) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या अधिवेशनात पंतप्रधान म्हणाले, की ५ लाख हेक्टर निकृष्ट जमिनीचा पोत सुधारण्याचे सुधारित लक्ष्य भारताने ठेवले आहे. अपेक्षेप्रमाणे ही मोठी वाढ नसली तरी आमची दिशा स्पष्ट आहे. जमिनीचा पोत सुधारण्याचे अनेक उपाय आहेत. वनीकरण करणे हा त्यापैकी एक आहे. त्याच दृष्टिने वनीकरणाचे प्रयत्न सर्वच स्तरावर केले जात आहेत.

    तेर पॉलिसी सेंटर फक्त थिंक टँक नसून, एक कृतिशील प्लॅटफॉर्म आहे. याच माध्यमातून गेल्या चार वर्षांत पुण्यात सार्वजनिक-खासगी भागिदारीतून शहरात वन निर्माण केले जात आहेत. माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शहरातील निकृष्ट जमिनींवर वनीकरणाला काही दिवसांपूर्वीच प्रारंभ केला होता. वनीकरणाला सुरुवात केली नसती तर या जमिनींवर आज सिमेंट-काँक्रिटचे मोठे इमले दिसले असते. पुण्यात आता जवळपास २० हेक्टर जमिनीवर शहरी जंगल पसरलेले आहे. 

    सार्वजनिक-खासगी भागिदारीतून वनीकरणाच्या कामात यश मिळविण्यासाठी खासगी क्षेत्र, तेर पॉलिसी सेंटर (https://terrepolicycentre.com), सामाजिक संस्था आणि  राज्य सरकारच्या वनविभागाने आता हातात हात घेतला आहे. स्मार्ट कँपस क्लाउड नेटवर्क अंतर्गत विद्यापीठ आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी दर आठवड्याअखेर एकत्रित येतात आणि रोपांना पाणी देणे, नको असलेले गवत काढणे, अशी ऐच्छिक सेवा करतात.

    अशा जंगलांमध्ये जवळपास ९ हजार देशी रोपे लावण्यात आली आहेत. या भागात हजारो नागरिक आरोग्यदायी वातावरणात फिरायला येतात. ही झाडे वर्षाला १३० मेट्रिकटन कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतात आणि ५६२ टन ऑक्सिजन निर्मिती करतात. वातावरणातील हरितगृह वायू शोषून प्राणवायू निर्मिती करण्यासाठी ही वने तुमच्याकडून पैसे मागत नाहीत. निस्वार्थी भावनेने ते काम करत असतात. पण मनुष्याकडून काय मिळते हे आपण पाहातच आहोत. 

    तेर पॉलिसी सेंटरचे स्मार्ट कँपस क्लाउड नेटवर्क हे जगातील विद्यापीठांचे जाळे आहे. शास्वत विकासाच्या ध्येयात (SDGs) योगदान देण्यासाठी विद्यापीठांच्या कँपसमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. जगात इतर अनेक अशा संस्था आहेत ज्या फक्त बोलण्यावरच विश्वास ठेवतात. त्यांना कृतीची जोड नसते. कदाचित अशा संस्थांनाच अधिक जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याची गरज आहे. 


    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *